Tuesday, April 22, 2008

असेन मी...नसेन मी.....

असेन मी...नसेन मी.....

८ एप्रिल २००८

परवाचीच गोष्ट आहे...माझ्या लंडनच्या फ़्लाइट्च्या ३६ तास आधी....रात्री मी अचानक जागी झाले..वाईट स्वप्न पडल्यामुळे!! तशी मला वाईट स्वप्नंच जास्त पडतात..अपघात, भूकंप (खूपच जास्त वेळेला), ज्वालामुखी, परग्रहावरच्या लोकांचा हल्ला, साप, विचित्र प्राणी....आणि अजून काय काय...यांनी माझी स्वप्ने भरलेली असतात. बरं हे सगळे..भितीदायक सिनेमे, सिरियल्स न पाहता, तसली पुस्तके अजिबात न वाचता बरं का( कधी तरी फ़ार फार पुर्वी थोडी पुस्तकं वाचली होती..आणि तसल्या सिनेमा, सिरीयलच्या जाहिराती चॅनेल्स बदलताना कधीतरी दिसणं अपरिहार्य आहे)...बघितले तर न जाणे काय होईल!!!!



तर........परवा रात्री..पहाटे जाग आली...वाईट स्वप्न....की माझे विमान बिल्डिंगला जाऊन धडकतेय...नेमके सांगायचे झाले तर......वर्ल्ड ट्रेड सेंटर पैकी दुस-या टॉवरला धडकलेल्या विमानात मी आहे अस मला दिसलं....खिडकीतून एक विमान धडकल्यामुळे पेटलेला, धूर निघणारा पहिला टॉवर दिसतोय..आणि आपण दुस-या टॉवरच्या दिशेने निघालेल्या विमान बसलो आहोत असं दिसलं.....मग जोरात धडक ....स्फोट....जबरदस्त हादरा....आग....सगळीकडे हल्लकल्लोळ, किंचाळण्याचे आवाज....सगलं काही दिसलं....ऐकू आलं......."जाणवलं"......पण स्वप्नात मी यातून वाचलेय...आणि पडलेल्या बिल्डिंगच्या ढिगा-यातून मदतीसाठी इकडे तिकडे दिशाहीन फिरतेय वगैरे वगैरे दिसलं....आणि मग मी दचकून जागी झाले.....बघितलं तर पहाटेचे ५-५.३० झाले होते....परत झोपच आली नाही!!......


विमान प्रवास ३६ तासावर आलेला असताना हे असलं स्वप्न??...ते पण माझ्यासारख्या भित्र्या मुलीला???.....बहुतांशी वेळेला अशी रात्री स्वप्नात पाहिलेली दॄष्यं दुपारपर्यंत मनात धुसर होऊन जातात. पण त्या दिवशी संध्याकाळ झाली तरी खिडकीतून दिसणारा जळता टॉवर...आपलं विमान दुस-या वरच्या दिशेने चाललेय....हे दॄष्य मनातून जाईना...दुस-या दिवशी सकाळी ७ वाजता मी एअरपोर्टला जायला निघणार होते. बरं हे सांगावं कुणाला??(निदान अगदी ताजं ताजं असताना)....घरी कुणाला, अगदी ताईला जरी हे बोलले असते...तर त्यांनी मला जाऊच दिलं नसतं. दोन व्यक्ती आहेत...ज्यांना मी असल्या...मला भिती वाटतेय...अशा तद्दन मुर्खपणाच्या गोष्टी सांगू शकते...पण त्यात सुध्दा एका व्यक्तीचा फोन नंबर रिचेबल नव्हता...दुस-या व्यक्तीला माझ्याशी तेव्हा बोलायला वेळ नव्हता!!!


असली स्वप्नं मला नेहमीच पडतात...नवीन नाहीये....आणि त्यांचा सत्यस्थितीशी काही संबध नसतो..विमानप्रवासाबद्दलचे विचार आणि WTC बद्दल नुकतीच कधीतरी पाहिलेल्या डिस्कव्हरीवरच्या documentry मधली दॄष्यं एकत्र झाली होती इतकंच!..पण मग मनात नकळतपणे विचार सुरू झाला...पहाटे पहाटे पडलेले स्वप्न...खरं झालं तर???

समजा स्वप्न खरं झालं तर.....किती लोकांशी बोलायचं राहून जाईल....अजून जन्म पण न झालेल्या माझ्या भाचा/भाची ला एकदा पाहायचे पण राहून जाईल...हा विचार मनात आला...आणि रात्री पॅकींग होइतोवर कितीही उशीर झाला तरी काहीतरी कारण काढून ताई ला भेटून आले.....हंऽऽऽऽऽऽ.....वाईट विचार करणे एकदा सुरू झाले की त्यांना काही अंतच नसतो....तरी ज्या सगळ्य़ा लोकांशी एकदा बोलावं असं वाटलं त्या सगळ्य़ांशी बोलायला काही जमलं नाही.


अर्थात हे विचार मी लिहीतेय याचा अर्थ माझं विमान काही पडलं नाही हे सरळ आहे...पण तरीही या स्वप्नामुळे..मी लंडनपर्यंतचा प्रवास नेहमीसारखा एन्जॉय करू शकले नाही...ढगाळ आणि खराब हवेमुळे ९ तासापैकी ५ तास तरी सीट बेल्ट्स लावायचे सिग्नल्स चालूच होते....सारखा टर्ब्युलन्स होता....मध्ये एक दोनदा खूपच जास्त हेलकावे खाल्ले विमानाने...आणि माझ्या मनात विचार आला....झालं.....आता आपलं स्वप्न खरं होणार की काय????...पण नाही....पोचले बुवा लंडन ला एकदाची...आणि गेली दोन वर्षे सतत विमान प्रवास करणा-या आणि प्रवास आवडणा-या...खिडकीतून बघत बाहेरचं दॄष्य एन्जॉय करणार-या मला...पहिल्यांदाच विमानातून बाहेर पडल्यावर...हुश्य......झालं!.....

मग हॉटेलवर पोचल्यावर शांत बसले आणि विचार सुरू झाला....मी घाबरट आहे ( हे सांगायला मला लाज वाटत नाही, आहे तर आहे...शूरपणाचा आव आणून मनातून भेदरण्यापेक्षा हे बरे आहे)...मोठ्या घरात मी एकटी रात्री कधी राहात नाही...अंधारात जात नाही....पण खरंच मला नक्की कशाची भिती वाटते?.... मॄत्यूची???...पण त्याला भिऊन काय होणार?...तो तर एक दिवस सगळ्यांनाच येणार आहे!...मग नक्की कशाची भिती??

मला वाटतं.....अंधाराला घाबरणारी माझ्यासारखी माणसं...खरंतर त्या अंधारातून अनपेक्षित असे काहीतरी बाहेर येईल, ज्याला सामोरे जायची आपली तयारी नसेल...या कल्पनेमुळे घाबरतात. आणि मॄत्यूपेक्षापण तो कसा होईल...आणि...मरणार हे कळल्या क्षणापासून प्रत्यक्षात त्या शेवटच्या क्षणापर्यंत जो काही काळ असेल...त्यात होणा-या मानसिक आणि शारिरीक यातनांच्या ते कल्पनेला घाबरतात. मला आठवतंय....माझी गाडी एकदा पावसाळ्यात (२००४ चा पावसाळा)वाईट्ट स्लीप झाली होती...तशी गाडीवरून स्लीप होणे किंवा दुस-या कुठल्या कारणाने मी त्याआधी अनेक वेळेला पडले होते...पण त्या प्रत्येक वेळी काय होतंय हे कळायच्या आत मी पडलेली असायचे....पण त्या वेळी मात्र गाडीचे मागचे चाक कशावरून तरी घसरतंय हे लक्षात येऊन...पायावर गाडीचे पूर्ण वजन घेऊन मी पडेपर्यंत सुमारे १० सेकंदाचा तरी काळ गेला.....पडण्यामुळे लागलेल्या मारापेक्षा पडेपर्यंत जे काय मनात विचार आले..रहदारीचा रस्ता..मागून येणारी बस....गाडीवर आपला काहीच ताबा नाही...भयानक!....तो प्रत्येक क्षण माझ्या मनावर कायमचा कोरला गेला.....रस्त्यावर पाणी (पावसाचे किंवा दुसरे कशाचेही) दिसले की माझा २ व्हीलर चालवायचा confidence पुर्णपणे संपतो.....त्या पाण्यावरून गाडीचे चाक जायला लागले की मला परत तेच क्षण आठवतात आणि परत गाडी स्लीप होतेय असं वाटायला लागतं.. मग त्या पाण्यात ऑइल पडलेलं असो वा नसो. हे इतके वाढले की गाडी घसरल्याचा भास सारखा होणे...या साठी डॉक्टरचा सल्ला घ्यावा काय असा विचार मनात येऊन गेला....................असो....ते मी केलं नाही...पण लवकरात लवकर कार घ्यायची यामागे.. पाऊस पडत असताना २-व्हीलर चालवायची नाही..हा एक मोठा विचार होता!

राहता राहीली..या स्वप्नामुळे मला विमानप्रवासाची तात्कालिक भिती.......मला वाटतं यात...स्वत:ची, बरोबरच्या माणसांची स्वप्नं, अपेक्षा अर्धवट टाकून, डाव अर्ध्यावर सोडून जावे लागेल...मग या सगळ्या लोकांचे काय होईल...वगैरे हुरहूर होती.....

भा.रा.तांबेची एक कविता होती आम्हाला..नववी किंवा दहावी ला..... अगदी पटेल अशी...

जन पळभर म्हणतील हाय हाय.....
मी जाता राहील कार्य काय....


आपण गेल्यावर जवळातील जवळ व्यक्तींचे पण आयुष्य थांबणार नाहीये....आपल्या आधी हे जग चालू होतं...नवनवीन घटना घडत होत्या...आपल्या नंतरपण हे चक्र असेच चालू राहील...याची खंत आहे या कवितेत......

कविता तर खूपच छान आहे त्यात काही वादच नाही...तरी मला ही कविता नकारात्मक वाटते...शांता शेळकेंची याच आशयाची एक दुसरी कविता आवडते...


असेन मी..नसेन मी....
तरी असेल गीत हे...
फुलाफुलात येथल्या...
उद्या हसेल गीत हे.....



फ़क्त एवढीच आशा..(निशा ला आशा :))) ) आहे की खरंच जेव्हा या जगाला अलविदा करण्याची वेळ( किमान अजून ४०-४५ वर्षांनी!!!) येईल....मी शांता शेळकेंच्या कवितेतल्या सारख्या विचारात असावं...तांबेच्या कवितल्यासारख्या नव्हे....

-निशा.


Wednesday, February 6, 2008

इडियट बॉक्स!!!!

२९ जानेवारी २००८


दररोज सकाळी ऑफिसला येताना आणि परत जाताना रेडिओ-मिर्ची ऐकत असते. गाण्याबरोबर त्या R.J. लोकांची बडबड आणि सर्व जाहिराती पण ऐकत राहणे क्रमप्राप्तच आहे. R.J. च्या बडबडीचे गु-हाळ तरी एकवेळ ठीक आहे पण काही जाहिराती फारच भयंकर असतात विशेषत: निरनिराळ्या टि.व्ही. चॅनेल्सवर नवीन सुरू होणा-या सिरीयल्सच्या जाहिराती!!


पहिली जाहिरात लागली......"सांस-ससुर के शादीकी सालगिरह ज्यादा मायने रखती है या मा-बाबा के घर पे सत्यनारायण पूजा......आप मेरी जगह होते तो आप क्या करते?"...करूण आवाजात प्रश्न येतो....मग अजून करूण आवाजात गाणे सुरू होते....."बाबुल का आंगन छूटे ना.."...आई गं........जाहिरातीतल्या प्रश्नावर मनात लगेच वात्रट उत्तर आलं..."दोन्ही गेले उडत....तू आपली नव-याबरोबर फिरायलाच जा कशी!!"....यावर हसून होत नाही तोच दुसरी सुरू...."ये मुकाबला नही जंग है...एक तरफ सिमी (आपली गिरेवालांची हो!) के मुंडे....तो दुसरी तरफ करन (तोच तो जोहरांचा!) की कुडीयॉं"...सिमी रांदेवू मध्ये (कॄपया स्पेलिंग विचारू नये) लोकांना पकवून थकली वाटतं...आणि करणकडे सध्या कोणी कॉफी प्यायला येत नसावे शिवाय KANK (कभी अलविदा ना कहना) ला लोकांनी फार लवकर अलविदा केल्यामुळे नवीन पिक्चर काढायला पैसेपण शिल्लक नसावेत...मग आणा आमने-सामने दोघांना...होऊन जाऊ दे...लोकांच्या सहनशक्तीचा अंत पाहुयातच!!!



टि.व्ही. इडियट बॉक्स या नावाला सार्थ ठरतोय...ज्याच्यासमोर सगळे इडियट्स भक्तिभावाने बसतात असा बॉक्स!..तमाम हिन्दी चॅनेल्सवर एकता कपूरच्या "के" मालिकांनी धुमाकूळ घातलाय नाहीतर रियॅलिटी(???) शोजनी!!!...आणि हे पुरेसे नसावे म्हणूनकी काय मराठी चॅनेल्सवर एकता कपूरच्या मराठी बहिणींनी काढलेल्या मालिका असतात.(खबरदार कोणी भलती सलती शंका घेतली तर! मला "गुणां"मुळे तिच्या बहिणी असं म्हणायचं होतं..सॉरी बरं का जितेंद्र!!) "वहिनीसाहेब" काय...."अधुरी एक कहाणी" काय...


हिन्दी असो वा मराठी, या सर्व मालिकांमध्ये काही गोष्टी समान असतात उदाहरणार्थ एक स्त्री पात्र अगदी पराकोटीची सत्शील..अगदी संत म्हणावी अशी चांगली असते...पण ती फार रंजलेली, गांजलेली असते...अगदी घरकामवाली बाई असावी अशी तिची अवस्था असते. आणि दुसरे एक स्त्री पात्र खलनायिका असते...अगदी जाम डेंजर बरं का...दररोज लग्नात नेसाव्यात तशा साड्या..डोळे दिपून जातील इतका भडक मेकअप!!! या खलनायिकेचे मागच्या जन्मी केलेल्या पुण्यामुळे असेल कदाचित..पण नशीब फार जोरावर असते. तिने केलेल्या सर्व कुकर्मांची जबाबदारी सत्शील नायिकेवर ढकलण्यात ती वारंवार यशस्वी ठरत असते. मग जेव्हा गेल्याजन्मीचा पुण्यसंचय संपायला लागतो..ती पकडली जाण्याची शक्यता वाढू लागते..तसे तिचे अचानक हॄद्यपरिवर्तन होते..ती एकदम संत होऊन जाते..भरजरी साड्या जाऊन त्या जागी सुती साड्या येतात...मग सत्शील नायिका या बदलामुळे तॄप्त तॄप्त होऊन विश्वासाने जेव्हा तिच्या खांद्यावर मान टाकते तेव्हा...खर्रर्रर्र...पुढच्या दॄष्यात खलनायिका छद्मी हसताना दिसते (कसं फसवलं या आविर्भावात!)..भाग इथेच संपतो. आणि हा नेमका आठवड्यातल्या शेवटच्या वारचा भाग असतो. मग तुम्ही शनिवार, रविवार आता बापड्या नायिकेचे काय होणार या चिंतेत घालवावा हा हेतु!!!


या मालिकेतल्या सर्व पात्रांचे एकच जिवितकर्तव्य असते ते म्हणजे एकमेकांच्या मार्गात जमतील तितक्या आणि जमतील तशा अडचणी निर्माण करता येतील ते पाहणे...पडणारा शेअरबाजार, डॉलरचा कमी होणारी किमंत, अमेरिकेतले मंदीचे सावट, पॄथ्वीचे तापमान, दिवसेंदिवस भयाण होणारा वाहतुकीचा प्रश्न असले इतर जगाला भेडसावणारे यत्किंश्चित प्रश्न त्यांना मुळीच सतावत नाहीत.


स्वत:च्या आयुष्यात इतके प्रश्न आधीच असताना टि.व्ही. वरच्या मालिकांमधल्या पात्रांच्या आयुष्याबद्दल इतका विचार करणारे लोक पाहिले की मला कीव येते. पण "विकतंय" म्हणूनच यात पैसा ओतणा-यांचे अजून असल्या मालिका काढायचं धाडस होतं हे सत्य आहे. देव जाणे या masses ची मानसिकता कधी बदलणार! पण मी मला स्वत:ला आणि माझ्या घरच्यांना पण या असल्या मालिकांची सवय लागू दिली नाही आणि कधी देणारही नाही!!!!!