Friday, July 26, 2013

उगाच चाललेले विचार!

आज कित्येक दिवस, महिने, वर्षांनी माझ्या या रडतखडत चाललेल्या (किंवा मरगळून गेलेल्या, जवळपास बंद पडलेल्या म्हणूयात ) ब्लॉगवर नवीन लिखाण का करावंस वाटलं बर मला?

जे माझ्या ब्लॉगच्या सुरूवातीला लिहिलंय तेच!.. "कोणी ऐकायला सापडले नाही, म्हणून लिहून ठेवलंय!"

आज ऑफिसमध्ये बसून मी चकाट्या पिटतेय, बरेच दिवस पूर्ण न झालेली झोप, फालतू कारणांनी सकाळपासून झालेली चिडचिड त्यामुळे आज विशेष काही भरीव काम माझ्या हातून होणार नाही हे तर माहित होतेच.

सुदैवाने मला अगदी प्रत्येक दिवसाचा, तासाचा हिशोब कोणी मागत नाही (तशी व्यवस्था आहे, त्यात मी तासांची नोंद पण करते) . पण जोवर हव्या असलेल्या वेळेत काम करून मिळतेय, ते सगळे व्यवस्थित चालतेय, त्या मध्ये फारसे कोणी पडत नाही.
माझे स्वतंत्र केबिन असल्यामुळे, आणि काही लोकांच्या (माझ्याबद्दल त्यांचे फार चांगले मत असल्यामुळे) ऑफिसमधील इंटरनेट वापराबद्दलाच्या माझ्यावर असलेल्या कॄपेमुळे मी एका कोप-यात बसून मॉनिटर वर कामाचे काही करतेय की अजून काही, कोणी विचारत नाही.

असो..नमनाला घडाभर तेल घालून झाले.

तर आज मी जे सगळे ब्लॉग्ज फॉलो करते, ते वाचून काढले, मी ज्या लोकांचे लेखन मराठी संस्थळांवर वाचत असते, आणि जे लोक मला संवेदनशील वाटतात त्यांचे वैयक्तिक ब्लॉग्ज पण शोधून वाचले. आणि ते लेखन, त्याचे विषय सोडून भलत्याच चिंतेने मला ग्रासले.

ह्यातील बरेचसे लोक, एकतर त्यांचे काही वैयेक्तिक/लौकिकार्थाने म्हणता येईल असे कुटुंब नाही किंवा असले तरी त्यांच्या बाकी सामाजिक गोष्टी मधील सहभाग/विचारांची पद्धत पचनी न पडल्याने विभक्त झालेले असे होते.

मग मी मला ज्यांचे एरवी लेखन आवडते, किंवा कोणत्याही क्षेत्रात महान कामगिरी मुळे आदरणीय असलेले लोक आठवले. बहुतांशी लोकांचे कौटुबिंक आयुष्य फारसे सुखकर नव्हतेच.

आता मला एक मुलगी आहे. अजून फारच लहान आहे. पण तिच्या वरती कुठले संस्कार व्हावे, तिने काय वाचन करावे. कशा प्रकारे एक चांगली, प्रगल्भ व्यक्ती होण्यासाठी तिच्या विचारांची दिशा असावी याबद्दल मी खूप विचार करत असते.

मग लक्षात आले, मला ती ज्या प्रकारी चांगली/प्रगल्भ/विचारी वगैरे व्हावी असे वाटते तशा प्रकारचे लोक मग महान ध्येयाच्या मागे धावता धावता ब-याच वेळेला कौटुबिंक आयुष्यात दु:खी किंवा त्या सुखाला पारखे  होतात. कधी पूर्ण विचारांती अशा गोष्टींपासून ते लोक दूरपण राहतात.

मला माझ्या मुलीला अशा प्रकारचे खरेच बनवायचे आहे का? माझ्या उतारवयात ती समजा असे आयुष्य जगली तर मला ते बघून बरे वाटेल का? चांगली/प्रगल्भ/विचारी वगैरे झाली तर सरसकट असे होईलच असे नाही, पण स्वत:पुरता विचार करणारे किंवा चाकोरीतून जाणारे लोक लौकिकार्थाने नक्कीच परिपूर्ण आयुष्य जगताना दिसतात.

पण मग ती अशीच लाखो करोडो लोकांसारखी चाकोरीतून जगताना आणि  माझ्या सारखीच शिक्षण/नोकरी/लग्न/संसार करून सरते शेवटी "जस्ट अनादर मिडीऑकर पर्सन" झालेली बघून तरी मला समाधान मिळेल का?

मलाच नक्की माहित नाहीये!

अर्थात इथे मी तिला काय बनवू इच्छिते यानेच सगळे होणार नाहीये, शेवटी जशी ती मोठी होईल तिचे स्वत:चे व्यक्तिमत्व बनेल आणि ती तिचे मार्ग निवडेल हे माहित आहे.  पण.. शेवटी एक आई/पालक म्हणून आपण स्वप्नांचे इमले बांधतच राहतो.

फार प्रश्न पडतात बुवा मला, नको ते! आणि ते कुठेतरी खरडण्यापर्यंत माझे वेगळेपण/विचारीपण सिमित आहे बहुतेक! ( बाकी लाखो करोडो "जस्ट अनादर मिडीऑकर पर्सन" सारखे!)








Friday, January 15, 2010

शेणाचे घर...मेणाचे घर.......

परवा अशीच कामवाल्या बाईशी बोलत होते, काहीतरी उशीर होण्यावरुन विषय निघाला आणि तिने कारण सांगितले की आदल्या दिवशी तिच्या मुलीची शाळेची ट्रिप गेली होती..मग एकूणच तिच्या सगळ्याच मुलांबद्दल ती सांगत होती....खर्च जास्त होता तरी मुलीची इच्छा होती ट्रिपला जाण्याची म्हणून तिने कसे पैसे जमवले...सकाळी उठून डबा करुन दिला.. दुसरी दहावीला आहे, तिला हवे असलेले क्लासेस लावताना पैश्याची कितीही ओढाताण झाली तरी ते ती करते....ते करणे कसे आवश्यक आहे वगैरे..वगैरे...
दोघी मुलींबद्दल ती इतके भरभरुन बोलत होती की मला आश्चर्य वाटले. कारण त्या बाईला इतके बोलताना मी कधी पाहिले नव्हते..कायम कामापुरते बोलणे..शांत पणे आपले काम करुन निघून जाणे....या मुळे मला ती बाई बरी वाटते ( हो ना... गॉसिप सेन्टर नसलेली कामवाली मिळणे अवघडच!)

मग नंतर विचार करत होते....तेव्हा जाणवले....तिचे सगळे आयुष्य..सगळ्या आशा आकांक्षा तिच्या दोन (कि तीन?) मुलींभोवतीच गुरफटलेल्या होत्या.... तिच्या आयुष्यात केली जाणारी प्रत्येक गोष्ट ही फक्त त्यांना जास्तीत जास्त चांगले शिक्षण/कपडे/आयुष्य देण्यासाठीच होती.

मग मला हे ही जाणवले.......की थोडया फार फरकाने आपल्या भोवतालीची सगळीच माणसे अशीच आहेत की! कशा ना कश्यात तरी आपला जीव गुंतवून बसलेली..त्यांची अवस्था ही त्या परिकथेतल्या राक्षसासारखी असते.... शरीर एकीकडे....आणि प्राण मात्र बाहेरच्या दुस-याच कुठल्या गोष्टीत..पोपट काय...किंवा संदूक काय....

मग त्य शरीराबाहेरचा जीव अवतिभोवतीची माणसेच असतात...कधी मुले कधी आयुष्याचा जोडीदार...कधी अजून कुणीतरी..... अगदी मनाच्या जवळ आणि प्रिय....

आणि ही सगळी लोकं मला इतके निर्धास्तपणे सगळा जीव आपल्या आपल्या पोपटात किंवा संदुकीत सुरक्षित आहे असे समजून वागताना दिसतात की जणू काही सगळे काही छानच होणार आहे.... कितीही वादळी पाऊस होऊ देत.... त्यांचे स्वप्नांचे घर चिऊताई सारखा मेणाचंच असणार आहे...सहजपणे वाहून जाणा-या काऊच्या शेणाच्या घराप्रमाणे त्यांच्या स्वप्नांचे इमले मुळीच वाहून जाणार नाहीयेत...

पण खरच किती लोकांची घरे मेणाची ठरतात?

इतक्यात मी माझ्या आजूबाजूला इतकी स्वप्नं उधळली गेलेली पाहिली आहेत की विचारु नका....हातातोंडाशी आलेला मुलगा/मुलगी किरकोळ आजारात गेले...... जन्मोजन्मी हाच मिळावा असा वाटायला लावणारा जोडीदार अपघातात गेला.....

दररोज पेपर उघडावा.....तर अशाच बातम्या दिसत असतात....स्वत:ची काही चूक नसताना अपघातात दगावलेले लोक.... क्षुल्लक कारणाने निराशेत आत्महत्या करणारी मुले....

मी त्या गेलेल्या लोकांपेक्षा...ते ज्यांचा जीव होते...त्या मागे राहिलेल्या लोकांबद्दल विचार करत राहते...... अस सगळं उधळलं गेल्यावर ते कसे आणि केव्हा सावरतील? नक्की पुर्णपणे सावरतील की एक कायमचा व्रण, पोकळी आयुष्यात घेऊन उरलेले आयुष्य रेटत राहतील?

मग लोकांचा विचार करता करता फिरुन गाडी स्वत:वर पण येते.....माझा (हो...या राक्षसिणीचा!!) जीव कुठे कुठे अडकलाय? निदान २-४ तरी पोपट अन संदुका आहेतच!!! आणि सगळे तितकेच आवश्यक....लग्न झाल्यानंतर आता अजून एक पोपट वाढलाय!!! :)

झाला असं की.... माझ्या मैत्रिणीच्या नात्यात एक जण असाच अपघातात गेला अचानक.... २/३ वर्ष झालेली लग्नाला..एक वर्षाचा मुलगा..... जरी मी पाहिलेलं नसलं त्याच्या बायको ला ...तरी अशी बातमी मनात घर करून रहिली.

अन त्याला दोन चार दिवस झाले नसतील...नवरा बाहेर गेला होता.... सांगून गेलेली वेळ उलटून पण बराच वेळ झाला तरी तो परत आला नाही (जे तो शक्यतो कधी करत नाही..उशीर होत असेल तर फोन करून कळवतो)......म्हणून मी फोन केला.... दोन चार वेळेला फोन उचलला नाही.... मला चिंता वाटायला लागली....थोडया वेळाने माझा missed कॉल पाहुन त्याने फोन केला...सांगितले की तो ट्रॅफिक मध्ये अडकलाय आणि १० मिनिटात पोचेल.... मग मी परत माझे उद्योग करता करता त्याची वाट बघायला लागले....१० ची जवळजवळ ३० मिनिटे झाली आणि दरवाज्याला किल्ली लावून साहेब स्वत:च घरात
आले..... "१० मिनिट सांगून अर्धा तास काय लावतोस रे"..असे मी म्हणेपर्यंत माझं लक्ष बाकीच्या गोष्टींकडे गेले... दोन्ही गुढगे, हात भरपूर खरचटून रक्ताळलेले होते.... पॅन्ट कुठेतरी अडकून थोडी फाटल्यासारखी दिसत होती... नंतर नीट बघितले तेव्हा पाठीला पण बराच मार बसला होता....

औषध लावता लावता मग त्याने सांगितले...एक कुत्रा मध्ये आला कुठुनतरी पळत रस्त्यात अचानक, त्याला धडकायला नको म्हणुन हयाने ब्रेक मारला तेव्हा मागचे दोन गाडीवाले जोरात येऊन त्याच्यावर धडकले वगैरे वगैरे....

ह्या दोन गोष्टीच्या लागोपाठ घडण्यामुळे असेल, नाहीतर मुळातला माझा घाबरट स्वभाव आहे म्हणुन ....पण सध्या माझ्या डोक्यात ही भीती कायम असते......माझ्या आयुष्यात महत्वाची असलेले कोणिही बाहेर गेले..वेळेत परत नाही आले....किंवा थोडे फार आजारी पडले की मी हायपर होते....या माझ्यामधल्या अचानक बदलाचे नव-याने कारण विचारले तेव्हा त्याला पण सांगितले, तर त्याने उडवून लावले....म्हटला"अपघात होत असतात म्हणून कोणी असे जगणे थांबवत नसते किंवा घाबरुन घाबरुन जगत नसते....तू नुकतीच जेव्हा गाडी शिकली होतीस...कॉलेजला घेऊन जायचीस तेव्हा तुझे आईवडिल काय असे ऊठ्सूठ चिंता करत होते का.... उगाच काहीतरी आपले..."..पटते मला तो जे म्हणतो ते, पण तरी वेळ आली की मनात परत शंका प्रवेश करतातच......

आणि असे आहे की...माझा जीव ज्यांच्यात आहे असे पोपट जाणा-या काळानुसार वाढतच जाणार आहेत...आज दोन चार लोक आहेत..... उदया मूल (किंवा मुले ;))... असेल....हे असे सदैव मन पोखरत राहणारे विचार नकोसे वाटतात.....

माझे आई-वडिल पण कधीतरी ह्याच मानसिक अवस्थेतून गेले असतील का?....असतील तर ते असे सदैव काळजी करत राहायचे का?....कि त्यांनी स्वत:च्या मनाची समजुत करून घेतली होती की त्यांचे घर मेणाचेच ठरेल? अन जरी केली असेल तरी ती करुन फारसे काही वाईट झाले असे नाहीये म्हणा....झालेच की बहुतेक सगळे नीट....

तुम्ही लाख सगळे सुरक्षित करायचा प्रयत्न कराल.....मेडिक्लेम घ्याल...इन्शुरन्स घ्याल.... पण इन्शुरन्स क्लेम कधीच वापरायची कुटुंबावर वेळ येऊ नये हीच इच्छाच असते. मेडिक्लेम पण दुर्धर आजारासाठी वापरण्याची वेळ येऊ नये अशीच मनोमन प्रार्थना असते...या इच्छा आणि प्रार्थना पूर्ण होणे किती प्रमाणात आपल्या हातात असते?

स्काय-डायविंग करताना ते १०-१५ क्षण जे काय घाबरले असेन ...त्या पेक्षा ही सारखी वाटणारी भीती जास्त त्रासदायक आहे.....ते बरे होते..... निदान जमिनीला पाय टेकल्यावर खात्री झाली की आता भीती संपली....नेहमीच्या आयुष्यात असे आहे की अखेरच्या श्वासापर्यंत हे नक्की होणारच नाहीये ना की आपलं घर शेणाचं ठरलं की मेणाचं.... ती दररोज नव्याने होणरी कसोटीच असणार आहे....त्यामुळे कुठल्याच दिवशी असे होणार नाही की तुम्ही निर्धास्त व्हाल की चला या पुढे सगळे नीटच होणार आहे.........

ते मात्र "भय इथले संपत नाही" च्याच चालीवर चालत राहतेय.........